नमस्कार मित्रांनो हवामान बदलामुळे भारतातील गहू आणि तांदळाच्या उत्पादनात ६ ते १० टक्क्यांची घट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतींवर होणार असून, देशातील अन्नसुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रवीचंद्रन यांच्या मते, हिमालयीन भागातील वेस्टर्न डिस्टर्बन्सेस (पश्चिमेकडील वातावरणीय विचलन) कमी होत आहेत, ज्यामुळे अब्जावधी लोकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय महापात्र यांनी यावर अधिक भर देत सांगितले की, हवामान बदलाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर देशाच्या अन्नसुरक्षेलाही बसणार आहे. भारतीय लोकसंख्येच्या ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, ८०% लोक सरकारी अन्नधान्य योजनांवर अवलंबून आहेत. त्यामुळे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्व स्तरांवर परिणाम होणार आहे.
नॅशनल इनोव्हेशन्स इन क्लायमेट रिसायलेंट ॲग्रिकल्चरच्या अंदाजानुसार, २१०० पर्यंत गव्हाच्या उत्पादनात ६ ते २५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे, तर २०८० पर्यंत तांदळाचे उत्पादन १०% कमी होऊ शकते. सध्या भारतात गव्हाचे उत्पादन ११३.२९ दशलक्ष टन आणि तांदळाचे उत्पादन १३७ दशलक्ष टन आहे. परंतु भविष्यात या उत्पादनांमध्ये मोठी घट होण्याचा धोका आहे, जो देशाच्या अन्नसुरक्षेवर गंभीर परिणाम करू शकतो.
हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांमुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर देशाला गंभीर अन्नसंकटाला सामोरे जावे लागू शकते.