मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील १४८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांसाठी सूक्ष्म नियोजन लोकसहभागातून केले जात असून, ही प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.
त्यांच्या हस्ते संत नामदेव कवायत मैदानावर मुख्य ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, जिल्ह्यातील १ लाख ८६ हजार शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी महाडीबीटी पोर्टलवरून ४,२१७ शेतकऱ्यांना सुमारे ७ कोटी ७१ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत १९८ उद्योगांना सुमारे १२ कोटी ४५ लाख रुपयांचे बँक कर्ज मंजूर झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत हळदीला तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे भौगोलिक मानांकन मिळाले असून, ही एक मोठी उपलब्धी आहे.