मंडळी देशभरातील कोट्यवधी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २०व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा महत्त्वपूर्ण स्रोत ठरली आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ६,००० रुपये मिळतात. ही रक्कम तीन समान हप्त्यांत, म्हणजेच दर चार महिन्यांनी २,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
२०व्या हप्त्यापूर्वी सरकारचा मोठा निर्णय
योजनेच्या अंमलबजावणीत अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे हप्ते वेळेवर मिळत नाहीत. परिणामी, त्यांना बँक किंवा सायबर कॅफेमध्ये चकरा माराव्या लागतात. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने आता जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपल्या तक्रारी थेट नोडल अधिकाऱ्यांकडे ईमेल किंवा फोनद्वारे मांडता येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अडचणीसाठी इथं-तिथं भटकण्याची गरज उरणार नाही.
नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क कसा साधाल?
शेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांची माहिती आता घरबसल्या मिळू शकते. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1) अधिकृत वेबसाइट http://www.pmkisan.gov.in वर जा.
2) Farmer Corner विभाग उघडा.
3) Helpdesk किंवा Contact Us वर क्लिक करा.
4) येथे राज्य व जिल्हानिहाय नोडल अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी पाहता येतील.
२०वा हप्ता कधी येणार?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता जून २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. याआधी १९वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी झाला होता, ज्याचा लाभ ९.८ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी घेतला. यामध्ये २.४ कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश होता.
ई-केवायसी अनिवार्य
ज्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ती पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने ही प्रक्रिया आता अधिक सुलभ केली आहे, आणि ती pmkisan.gov.in या वेबसाइटवरून पूर्ण करता येते.