मंडळी राज्यात सध्या लाडकी बहिण योजना चर्चेत असताना, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या योजनेबाबत मोठे विधान केले आहे. सकाळ कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली आणि ही योजना लवकरच बंद होईल, असा दावा केला.
मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एव्हीएम घोटाळा लपवण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. ते म्हणाले की, त्यांनी कुठेही राजकारण न करता काम केले आहे, मात्र सध्या मेट्रो प्रकल्प रखडले आहेत. महापालिका निवडणुकांनंतर सरकार लाडकी बहिण योजना बंद करणार असून, त्यासोबतच तीर्थयात्रा योजना आणि शिवभोजन योजना देखील बंद केल्या जातील. मतांचा घोळ लपवण्यासाठी सरकारने ही योजना आणली होती, पण ती फार काळ टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील समस्या आणि नागरी सुविधांबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, रात्रीच्या वेळी गर्दी कमी असताना ते स्वता रस्त्यांची पाहणी करतात आणि त्यामुळे दोन वर्षांत खड्डेमुक्त रस्ते करण्याच्या सरकारच्या दाव्यात तथ्य नाही, हे स्पष्ट होते. मुंबईतील समस्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, निवडणुका घेतल्या जात नाहीत आणि नागरिकांना नगरसेवक नसल्याने प्रशासनाशी संवाद साधणे कठीण झाले आहे. कचरा व्यवस्थापनही ठप्प झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभरात लाडकी बहिण योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली असून महिलांच्या खात्यात हप्ते जमा होत आहेत. त्यामुळे ही योजना लोकांची फसवणूक करणारी नाही, असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. सरकारच्या तिजोरीवरील भार वाढल्याने तीर्थयात्रा योजना, शिवभोजन योजना आणि काही इतर योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विरोधक या मुद्द्यावर सरकारवर सातत्याने टीका करत आहेत.