मंडळी महाराष्ट्र सरकारने डिजिटल सेवांचा विस्तार करत मोठा निर्णय घेतला आहे. आता WhatsApp वर तब्बल 500 शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विशेष कार्यक्रमात याची घोषणा केली. महाराष्ट्र हे WhatsApp वर सरकारी सेवा देणारे देशातील दुसरे राज्य ठरणार असून, याआधी आंध्र प्रदेशने 161 सेवा सुरू केल्या आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शासकीय सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकारने Meta (WhatsApp ची मालकीची कंपनी) सोबत भागीदारी केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळाव्यात, हा यामागील उद्देश आहे.
या सेवांमध्ये तिकीट बुकिंग, तक्रारी नोंदवणे, कागदपत्रांसाठी अर्ज करणे यांसारख्या सुविधा उपलब्ध होतील. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, हा निर्णय महाराष्ट्राला डिजिटल राज्य बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याचे उद्दिष्ट मांडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिनटेक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
मंत्रालयातील वॉर रूम चे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, पूर्वी कोणत्याही प्रकल्पासाठी 18 वेगवेगळ्या विभागांची परवानगी आवश्यक होती. मात्र, वॉर रूममुळे सर्व निर्णय प्रक्रिया झपाट्याने होते. मेट्रो, कोस्टल रोड आणि अतुल सेतू (मुंबई ट्रान्सहार्बर लिंक) यासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी वॉर रूमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
राज्यातील तीन मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वधावन पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नदीजोड प्रकल्प हे तीन महत्त्वाचे प्रकल्प असल्याचे सांगितले.
वधावन पोर्ट हा सध्या कार्यरत असलेल्या जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठा असणार आहे. 20 मीटर खोल समुद्रकिनारी हे बंदर उभारले जात असून, जगातील सर्वात मोठी जहाजे सहज प्रवेश करू शकतील. हा प्रकल्प 76,220 कोटी रुपयांचा असून, भारताच्या सागरी व्यापाराला मोठी चालना देणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झाल्यावर संपूर्ण नवी मुंबई परिसर एक मोठे व्यावसायिक केंद्र बनेल. यामुळे मुंबईच्या उपनगरांसह संपूर्ण कोकण भागाला मोठा फायदा होईल.
नदीजोड प्रकल्प राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी आणि जलव्यवस्थापन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
WhatsApp वर 500 शासकीय सेवा सुरू करणे हा महाराष्ट्राच्या डिजिटल क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना घरबसल्या त्वरित सेवा मिळतील, वेळ आणि पैशांची बचत होईल, तसेच शासकीय प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल.
या पुढील काळात महाराष्ट्र डिजिटल क्रांतीमध्ये देशाच्या आघाडीवर असेल, असे स्पष्ट संकेत या उपक्रमातून मिळतात.