नमस्कार सध्या शेतकरी विविध नैसर्गिक आपत्तींच्या कचाट्यात अडकलेले आहेत – दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यांसारख्या संकटांमुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच हमीभावाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. राज्यातील तब्बल १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांचे बँकांचे कर्ज थकले असून, त्यांच्यावर एकूण ३० हजार ४९५ कोटींचे थकीत कर्ज असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व वाशिम या जिल्ह्यांमध्ये ५६ ते २०० कोटींपर्यंत थकबाकी आहे. तर इतर २७ जिल्ह्यांमध्ये थकीत कर्ज ४०० ते २८५७ कोटींवर गेले आहे. विशेषता जालना, बुलढाणा, परभणी, पुणे, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, धुळे, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, आणि नगर या जिल्ह्यांत शेतकऱ्यांकडे सर्वाधिक थकीत कर्ज असल्याचे आढळले आहे.
बँका थकबाकीदार शेतकऱ्यांकडून वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करीत असून, नोटिसा पाठवल्या जात आहेत. दुसरीकडे, खासगी सावकारांकडूनही वसुलीची प्रक्रिया कठोर करण्यात येत आहे. यामुळे अडचणीतील शेतकरी आर्थिक संकटाच्या चक्रात अडकले आहेत, आणि अशा परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीतून दिसून येते.
या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही त्यांच्या वचननाम्यात ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे कमी होईल अशी अपेक्षा आहे.
शेतकरी थकबाकी स्थिती
- एकूण शेतकरी : १,३१,३४,८१९
- शेतकऱ्यांकडील एकूण कर्ज : २,४९,५१० कोटी
- थकबाकीदार शेतकरी : १५,४६,३७९
- थकीत कर्ज : ३०,४९५ कोटी
सर्वाधिक थकीत कर्ज असलेले जिल्हे
1) जालना – १६३५ कोटी
2) बुलढाणा – १०४८ कोटी
3) परभणी- ११८० कोटी
4) पुणे – २३१२ कोटी
5) नांदेड – ९०७ कोटी
6) यवतमाळ – १८२७ कोटी
7) वर्धा – ८६२ कोटी
8) सोलापूर – २६२६ कोटी
9) धाराशिव – ९११ कोटी
10) नाशिक – २८५७ कोटी
कर्ज वसुलीसाठी कार्यवाही
जून २०२० पर्यंत जिल्हा बँकेने थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) आणली आहे, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या सोलापूर जिल्हा बँकेकडून ७०० कोटींपर्यंतची थकीत रक्कम वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
अशा या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे.