मंडळी महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला असून उष्ण वातावरणाचा प्रभाव कमी झाला आहे. हवामान विभागाने आगामी पाच दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासोबतच दक्षिणेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने हवामानात वेगाने बदल होत आहेत.
महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, आगामी पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. दिवसा तापमानात हळूहळू वाढ होईल, परंतु संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू होण्यामुळे कमाल तापमानात घट होऊ शकते.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांपर्यंत याच प्रकारचे हवामान राहू शकते. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहील.
दुसरीकडे, जळगाव, नाशिक, घाट परिसर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, चंदूपर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.